मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारकडून एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान एक देश, एक निवडणूक हे षडयंत्र असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे. काय झालं जम्मूत? आधी जम्मूत इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
नरेंद्र मोदी सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. त्या दरम्यान ‘एक राष्ट्र एक निवडणूक’संदर्भातली घटनादुरुस्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर इंडियाच्या बैठकीआधी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. इंडिया आघाडीला घाबरून मोदींनी ‘एक राष्ट्र एक निवडणूक’चा घाट घातल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
वन नेशन वन इलेक्शन वो क्या होता है भाई? हा देश एक आहे ना? वेगळा आहे का? या देशात कोणी वेगळी गोष्ट कशी काय करू शकतो? हा वन नेशनच आहे ना? त्यात काही शंका आहे का? कुणाला शंका आहे? निवडणुकाही एक होतात. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्या ऐवजी फेअर इलेक्शन घ्या. हा आमचा नारा आहे. वूई वांट फेअर इलेक्शन. ते घेत नाही म्हणून वन नेशन इलेक्शन सुरू केलं आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचं हे षडयंत्र आहे, असा आरोप राऊत यांनी केला.