मुंबई (वृत्तसंस्था) नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली असून, आझाद मैदान ते विधान भवनापर्यंत धडक मोर्चाचे काढण्यात आला. तसेच विधानसभेतील आपल्या विधानाचा उल्लेख करत कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक होती. पिक्चर अभी बाकी है… आणखी बॉम्ब ठेवलेत, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
हा संघर्ष साधा नाही. तर देशभक्तांचा संघर्ष आहे. देशद्रोह्याच्या विरोधात संघर्ष आहे. पाकिस्तान धार्जिण्या लोकांविरोधात संघर्ष आहे. ज्या भारतमातेसाठी अनेकांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे. दहशतवाद्यांसोबत आर्थिक व्यवहार असलेल्या आरोपामुळे जेलमध्ये गेलेल्या मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोवर शांत बसू शकत नाही. ही मागणी केवळ राजकारणासाठी नाही. आम्ही रोज राजीनामे मागत नाही. मात्र ही घटना पाहिली तर मुंबईकरांच्या मारेकऱ्यांसोबत ज्यांनी आर्थिक व्यवहार केले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभेतील आपल्या आरोपांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालचा पेनड्राइव्ह बॉम्ब ही केवळ एक झलक होती. पिक्चर अभी बाकी है…. आणखी बॉम्ब ठेवले आहेत. तुम्ही आमच्याविरोधात षडयंत्र करत आहात. पण आम्ही घाबरणार नाही. एका नरेंद्र मोदीला संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला. परंतु जनतेचा आशीर्वाद असल्यानं ते जागतिक नेते झाले. आम्ही मोदींचे सैनिक आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्यामागे आहे. आमचे संबंध गुन्हेगारांशी नाही. आमच्याविरोधात कितीही षडयंत्र केले तर शिवरायांच्या आशीर्वादाने ते हाणून पाडू. आमच्याकडे अनेक बॉम्ब आहेत. योग्यवेळी तो फोडला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.