मुंबई (वृत्तसंस्था) मी जुहूबद्दल सांगितलेल्या प्लॉटची माहिती समोर येईल. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वत:लाच मारणार आहे. महाराष्ट्रातील लोक एक दिवस त्याची धिंड काढणार आहेत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
फडणवीसांच्या नावाने किरीट सोमय्यांनी शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवलं, प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या करत व त्यांच्या तसंच अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप करता देवेंद्र फडणवीसांना मात्र क्लीन चिट दिली आहे. “किरीट सोमय्यांनी फक्त ईडीच्या नावे नव्हे तर फडणवीसांच्या नावेदेखील वसुली केली आहे. त्यांनी फडणवीसांना ५० कोटी देणार असल्याचं सांगितलं होतं,” असा आरोप संजय राऊतांनी केला. “आपल्या मागे काय चाललंय हे फडणवीसांना माहित नसावं. असे घोटाळे फडणवीस करतील असं मला वाटत नाही. पण त्यांच्या नावे हा घोटाळा करण्यात आला असून संबंधित सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. आता मुख्यमंत्र्यांनाही भेटून या सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
“मी जुहूबद्दल सांगितलेल्या प्लॉटची माहिती समोर येईल. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वत:लाच मारणार आहे. महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत,” असं संजय राऊत म्हणाले. “चंद्रकांत पाटील वैगेरे भाजपाचे काही नेते मधे पडत आहेत. पण त्यांनी मधे पडू नये अन्यथा उघडे पडतील. उगाच या प्रकरणात पडू नका. लोक सोमय्यांची धिंड काढणार असून त्यात तुम्ही सहभागी झालात तर लोक तुमचेही कपडे काढतील,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.
“महाराष्ट्रात लूट सुरु आहे आणि आम्हाला सांगत आहे. आता मी रोज भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढणार आहे. लोकं समोरुन येऊन माहिती देत असून किरीट सोमय्यांची एकूण २११ प्रकरणं समोर आली आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केलेत,” असा आरोप संजय राऊतांनी केला. किरीट सोमय्या दलाल, चोर आणि लफंगा असल्याचंही यावेळी ते म्हणाले.