लंडन (वृत्तसंस्था) जगातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या राजघराण्याला धक्का देणारी बातमी लंडनमधून आली आहे. ब्रिटीश राजघराण्यातले वयाने सर्वांत ज्येष्ठ सभासद आणि महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं. प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले आहे.
दरम्यान, प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबाबत बकिंगहम पॅलेसने याबाबत पत्रक जारी केलं आहे. ” राणी एलिझाबेथ यांनी अत्यंत दुख:द घोषणा केली आहे. प्रिय पती प्रिन्स फिलीप यांचं निधन झालं आहे. आज सकाळीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. प्रिन्स फिलीप यांच्या निधनानंतर संपूर्ण ब्रिटनवर दुखवटा आहे. ब्रिटनमधील ऐतिहासिक इमारतींमधील ब्रिटीश ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
प्रिन्स फिलीप यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मागील महिन्यात १६ मार्चला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ९९ वर्षीय फिलीप यांना १६ फेब्रुवारीला लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना संसर्ग आणि हृदय रोगावरील उपचारासाठी त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, प्रिन्स फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ यांचा विवाह सन १९४७ मध्ये झाला होता. लग्नानंतर ५ वर्षांनी एलिझाबेथ महाराणी बनल्या होत्या. प्रिन्स फिलिप आणि राणी एलिझाबेथ यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या लग्नाचा ७३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पणतू आहेत. प्रिन्स फिलिप २०१७ मध्ये शाही जबाबदाऱ्यांमधून निवृत्त झाले होते. राजघराण्याच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी २२ हजारहून अधिक कार्यक्रमांना हजेरी लावली आणि ५ हजारपेक्षा जास्त भाषणं केली होती.
जालीयनवाला बाग हत्याकांडातील जखमींची संख्या विचारली
प्रिन्स फिलीप हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठीही ओळखले जात होते. भारतात त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडातील जखमींच्या संख्येवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. प्रिन्स फिलीप हे चारवेळा भारतात आले होते. तीनवेळा राणी एलिझाबेध यांच्यासोबत तर एकदा स्वतंत्र भारतभेटीवर आले होते. जेव्हा ते १९९७ मध्ये भारतात आले होते, त्यावेळी त्यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडावर भाष्य केलं होतं. या हत्याकांडातील जखमी मृतांची संख्या विचारली होती.