भुसावळ (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी बेदम मारहाण केली. यात कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात तुरूंग अधीक्षकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, चांगदेव येथील सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांना दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी ज्युडि, मॅजि. सो मुक्ताईनगर यांचे कडील वॉरंटव्दारे दुय्यम कारागृह भुसावळ येथे ठेवलेले असतांना पोहेकॉ सुभाष बाबूराव खरे, पोहेकॉ भानुदास निवृत्ती पोटे, तुरुंग रक्षक सीताराम विठ्ठल कदम यांनी विनाकारण त्यांना धाकदपटशा दाखवुन, घाबरवून त्यांना धीर न देता किंवा औषधोपचाराची गरज आहे. हे ओळखुन त्यांच्यावर उपचार न करता उलट मयत सुनिल भागवत तारु यांना कोणत्यातरी वस्तुने त्यांच्या पाठीवर, ढोपरावर, डोक्यावर मारहाण केली. त्यामुळे त्यांना शरिरावर झालेल्या दुखापतींमुळे व डोक्यात आतुन झालेल्या जखमांमुळे दि.०४ मार्च २०२० रोजी त्यांची तब्बेत सिरीयस असल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरु असतांना ते दि. ०७ मार्च २०२० मृत्यू झाला. याप्रकरणी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (वय ३५, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ पोलीस ठाण्यात तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, पोहेकॉ सुभाष बाबूराव खरे, पोहेकॉ भानुदास निवृत्ती पोटे, तुरुंग रक्षक सीताराम विठ्ठल कदम, तुरुंग रक्षक अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.