धरणगाव/जळगाव( प्रतिनिधी ) — जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील शेतकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या मागणीसाठी झुरखेडा येथे आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भेट दिली व लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत व्याजाची बेकायदेशीर वसुली केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.हे आमरण उपोषण आज सकाळी १०:०० वाजता झुरखेडा येथील स्वयंभू महादेव मंदिर येथे सुरू झाले असून, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
श्री गुलाबराव बाबूराव देवकर यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करून, सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती तात्काळ उठवून कठोर कारवाई करण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत शेतकऱ्यांकडून आकारलेले व्याज तात्काळ परत करण्यात यावे व पुढे कोणतेही व्याज आकारू नये. तसेच, मागील सहा वर्षांपासून पीककर्ज न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी.
विभागीय सहनिबंधक नाशिक श्री संभाजी निकम यांच्यावर निष्काळजीपणा व कर्तव्यच्युतीबद्दल शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फ करण्यात यावे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वरील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासन यांची राहील.
या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. तसेच विविध शेतकरी संघटनांकडून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

















