पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाढत्या महागाईवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच ‘तुम्ही कितीही ईडी लावा, सीडी लावा काहीही झालं तरी राज्यातलं हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल’, असंही पवार म्हणाले. ते पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
राज्यातील जनतेचे सुख दु:ख जाणून घेण्यासाठी राज्यात शक्य आहे तिथे दौरा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. देशात रोज पेट्रोल डिझलचे दर वाढत आहेत. जगात तेलाच्या किंमती वाढल्या म्हणून भारतात वाढल्या हे सांगायला कारण झाले. मात्र जगात कींमती कमी झाल्या तरी भारतात कमी केल्या नाहीत, येथे वाढीव दरच ठेवण्यात आले, असे पवार म्हणाले. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाची भूमिका कामगारांविरोधात आहे. जे कामगारांचे रक्षण करत नाहीत. त्या लोकांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, अस म्हणत शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला.
ईडी-सीडी लावा हे सरकार ५ वर्ष हटणार नाही, त्यानंतर देखील हे सरकार निवडून येईल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, “सुदैवाने उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये महाराष्ट्राची सुत्र आहेत. तीन पक्षाचं सरकार आहे. या सरकारमध्ये औद्योगिक सुधारणा करण्याची जी काय गरज आहे. ते निच्छित करणार आहोत. तसेच अधिक कामगारांना काम कसं मिळेल, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. आज हे सरकार त्या दृष्टीने जात आहे. मात्र ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे. त्या भाजपाच्या नेतृत्वाची भूमिका काय आहे. केंद्र सरकारचं काम राज्याला मदत कारायचं असते. मात्र जीएसटीचे ३० हजार कोटी केंद्राकडे पडून आहेत. ते राज्याला देण्याचं काम आज केंद्र सरकार करत नाही. राज्य सरकारला आर्थिक अडचणीत आणायचे आणि सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. कधी सीबीआय, ई़डी, एनसीबीची या सगळ्या संस्था आज सरकारमधील लोकांना संकटात आणण्याचे काम करत आहेत.”
















