जळगाव (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केल्यानंतर जळगावसह खान्देशात लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरात बळीराजा आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकसंघर्ष मोर्चाच्या सीताबाई तडवीचे बलिदान व्यर्थ गेले नाही, हा शेतकऱ्यांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया लोकसंघर्ष तसेच राष्ट्रीय कृषी समितीच्या सदस्य प्रतिभाताई शिंदे यांनी दिली.
शेतकऱ्यांवर लादलेले ३ अन्यायकारी व काळे कायदे रद्द केंद्र सरकारला अखेर रद्द करावे लागले. हा देशभरातील शेतकरी बांधवांचा मोठा विजय आहे. शेती हा या देशातील शाश्वत उद्योग आणि शेतकरी ही या देशातील सर्वात मोठी ताकद आहे हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले. थंडी, वारा, ऊन, पाऊस ज्यांच्या पाचवीला पुजलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या निर्धाराला केंद्र सरकारची मग्रुरी व अट्टहासी धोरण हरवू शकले नाही. कृषी कायदे लागू करणे ही चूक होती हे मोदी सरकारला मान्य करावे लागले. देशभरात गावागावात, विविध राज्यात विखुरलेल्या पण केंद्र सरकारच्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध एकजूट दाखवणाऱ्या, शेती हा धर्म मानणाऱ्या शेतकऱ्यांनी एकप्रकारे सरकारला वठणीवर आणले. हा कृषिप्रधान भारताच्या कृषिक्षक्तीचा विजय आहे, असे प्रतिपादन लोकसंघर्ष तसेच राष्ट्रीय कृषी समितीच्या सदस्य प्रतिभाताई शिंदे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केल्यानंतर जळगावसह खान्देशात लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी ही प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, आंदोलनात शहिद झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे स्मरण केले व त्यांना आदरांजली वाहिली. मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयासाठी देशातील अनेक शेतकरी व महिलांना बलिदान द्यावे लागले आहे. त्यांचा कधीही विसर पडू शकत नाही. मुळात हे तिन्ही कायदे रद्द झाले असले तरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारसमित्या व खाजगी व्यापाऱ्यांनी हमीभाव दिलाच पाहिजे हा प्रश्न बाकी आहे. आज शेतकरी जो सर्व बाजूंनी महागाई आणि नैसर्गिक संकट या दुहेरी सापळ्यात अडकला आहे. त्यातून त्याला सोडवण्यासाठी सर्वंकश कृषिहिताचे धोरण जाहीर करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचे मूळ प्रश्न अजूनही शिल्लक आहेत आणि त्यासाठी ही लढाई अजून संपलेली नाही. येथील उद्योगपतींना फायदा करून देण्यासाठी मोदींसरकारने हे तीन कृषी विरोधी कायदे मध्येच येथील बळीराजाच्या माथी मारले होते ते परतवून लावण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर हा लढा द्यावा लागला. मात्र शेतकऱ्यांना हमीभाव व स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारशीं ची अंमलबजावणी ह्या मागण्यांसाठी हा लढा सुरूच राहील. गेले वर्षभर दिल्लीच्या सीमांवरती “डेरा डालो घेरा डालो” म्हणत केंद्राच्या अन्यायकारी ३ शेतकरी विधेयकांच्या विरोधात पंजाब व हरियाणा च्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते आणि आज केंद्रसरकारला अखेर या आंदोलनापुढे झुकावे लागले व मोदींनी हे कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे
महाराष्ट्रातुन प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चा सुरवातीपासून यात सहभागी होता. गावागावांपासून तहसील कचेरी, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय या सर्व ठिकाणी लोकसंघर्ष मोर्चाने हा लढा लावून धरला होता. मात्र प्रत्यक्ष दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांसोबतही १००० महिला शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष सहभाग घेतला. ज्यामध्ये सीताबाई तडवी या संघटनेच्या लढाऊ महिला नेतृत्वाला आपले बलिदान द्यावे लागले. आज शहीद सीताबाई तडवी यांच्या बलिदानाला यश आलं. महाराष्ट्रातील बळी गेलेल्या सीताबाई तडविंसह देशभरातून ७०० शेतकऱ्यांनी या आंदोलनात आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. लखीमपूर येथील सरकारनेच चिरडून टाकलेल्या शेतकऱ्यांची हत्या ही सर्वांच्या लक्षात आहे. या सर्व बलिदान करणाऱ्या शेतकऱ्यांना स्मरण करत केंद्र सरकारला हे काळे कायदे मागे घ्यायला भाग पाडणारा देशातील बळी राजाचा जो हा विजय आहे. त्याचे आम्ही स्वागत करीत आहोत मात्र लढाई अजूनही संपलेली नाही, असेही प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले.
मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाला आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न केला, आंदोलनाला बदनाम करण्यासाठी साम, दाम, दंड या सर्वांचा वापर केला गेला. भाडोत्री मीडिया दिवसरात्र या आंदोलनाविरुद्ध गरळ ओकत राहिला. तरीही शेतकरी आंदोलन मागे सरले नाही. आंदोलनात ७०० च्या वर शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागले. या सर्व मृत्यूंचे पातक या सरकारवर आहे. आता पंजाब व उत्तरप्रदेश च्या निवडणुका समोर असल्या तरी वर्षभर या दुराग्रही सरकारच्या समोर नेटाने अहिंसक लढाई लढत या सरकारला घुटण्यावर आणत घाम फोडला म्हणून केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. जर खरंच शेतकरी हित महत्वाचे वाटत होते तर हे कायदे मागे घ्यायला वर्षभर वाट का बघितली याचे उत्तरही सरकारने द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
आज सिताबाईंचे बलिदान स्मरण करून केंद्रसरकारविरोधातील लढा यशस्वी झाल्याचा आनंद आहे आणि बलिदान करणाऱ्या तमाम शहीद शेतकऱ्यांना वंदन करत आम्ही हा विजय साजरा करत आहोत, असे प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले. या निर्णयानंतर खान्देशात जल्लोष झाला.