मुंबई (वृत्तसंस्था) हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची बातमी काल समोर आली होती. या घटनेवरुन मोठं राजकीय वादळ उठलं आहे. आतापर्यंत देशभरातील अनेक पक्षांनी, नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. आता या घटनेबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
माध्यमांशी बातचीतदरम्यान दावन म्हणाले की, ‘राहुल गांधींना कोणीही धक्काबूक्की केली नाही. गर्दीतून चालत जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पडले असावे. एवढ्या मोठ्या नेत्याला धक्काबुक्की कोणीही करू शकत नाही. आम्हीही अनेकदा अशा गर्दीत जातो. लोकांच्या गर्दीमुळे तोल जाऊ शकतो’, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की व अटक केल्याचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंत्रालयाशेजारच्या गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दिकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दिकी, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकार व योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.