मुंबई (वृत्तसंस्था) नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही,’ अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
विरारमधील आगीच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य.पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.