चोपडा (प्रतिनिधी) येथील रहिवासी व सध्या माउंट आबू (राजस्थान) येथील उपखंड कलेक्टर गौरव रवींद्र साळुंखे यांनी माउंट आबू येथे केलेल्या कामांची जोरदार दखल तेथील प्रिंट व डिजिटल मीडियाने घेतली आहे. साळुंखे यांनी कमी कालावधीत आपल्या कामाची छाप पाडून डॅशिंग अधिकारी म्हणून छबी निर्माण केल्याचे तेथील नागरिकांमधील चर्चेतून दिसून आले.
चोपडा येथील गौरव साळुंखे पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन दिल्ली, भरतपूर व सध्या राजस्थान मधील माउंट आबूला उपखंड कलेक्टर म्हणून कार्यरत असून त्यांनी तेथे कामाचा धडाका लावला आहे. आपल्या कामांच्या जोरावर थोड्याच अवधीत लोकप्रिय अधिकारी म्हणून त्यांची छबी निर्माण झाली असून त्यांची काही कामे जनतेच्या नजरेस भरली आहेत. सर्वात उंच ठिकाणी असलेल्या शेरगाव येथील नागरिक आजपर्यंत मतदानासाठी खालील केंद्रांवर येत असत परंतु साळुंखे यांनी 15 किलोमीटर माथ्यावरील गावात पायी जात 1500 मीटर उंचीवरील शेरगाव व उतरज केंद्र उभारण्याची पाहणी करून मतदान केंद्र व त्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनांची जुळवा जुळव करत हे केंद्र सुरू करून एक नवा इतिहास रचला आहे.
आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पंधरा किलोमीटर राज्यातील सर्वात उंच ठिकाणी पायी जाऊन व पशुंची भीती असलेल्या ठिकाणी स्थानिकांची नेमणूक करून व्यवस्थितपणे मतदान हाताळल्याने त्यांची शासकीय स्तरावरही प्रशंशा झाली आहे. भरतपूर येथील अशाच काही काळ असलेल्या कार्यकाळात त्यांनी अतिक्रमण काढून जनतेची प्रशंसा मिळवली होती. माउंट आबू उपखंडात सर्वत्र पहाडी भागात असलेल्या विविध टापूमध्ये त्यांनी अनेक कामे सुरू केली असून ती सहकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली आहेत. सध्या तीन विभागांचा कार्यभारही त्यांच्याकडे असल्याने कामाचा व्याप मोठा असला तरी सुद्धा मोठ्या जिद्दीने खानदेश पुत्र साळुंके हा भार सांभाळत असून राजस्थानात खानदेश चा डंका वाजविण्यात यशस्वी ठरले आहेत.माउंट आबू ला दररोज हजारो पर्यटक येतात त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्याकडेही त्यांनी लक्ष पुरविले आहे.