कोल्हापूर (वृत्तसंस्था) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. यावरून आता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्पष्ट केलं की ‘होय, मला भाजपमध्ये जाण्यासाठी दीड वर्षापूर्वी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता’, अशी कबुली त्यांनी दिली आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस विभागात बदलीसाठी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तातडीने या विषयावरचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. यामध्ये त्यांनी रश्मी शुक्ला यांचे दावे, बदलीच्या प्रक्रिया आणि फोन टॅपिंग याबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकल्याचा आरोप सरकारकडून केला जात होता. राज्यात सरकार स्थापन करतेवेळी मी भाजपसोबत जावे यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, अशी कबुली आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला यड्रावकर यांच्या कबुलीने पुष्टी मिळाली आहे.
ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही कानावर घातल्याचे यड्रावकर म्हणाले आहेत. सरकार स्थापन करताना यड्रावकर यांच्यावर रश्मी शुक्ला यांनी दबाव टाकला होता, असे ट्विट आव्हाड यांनी केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर यड्रावकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संध्याकाळपर्यंत फोन न उचलण्याची भूमिका घेतली होती. संध्याकाळी मात्र त्यांनी ही कबुली दिली आहे.
सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आले. तत्पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. मात्र, जागा वाटपात ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. विजयानंतर त्यांनी भाजप सोबत यावे यासाठी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केला होता असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘होय, मला रश्मी शुक्ला यांचा फोन आला होता.’
प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी यावर अधिक माहिती दिली. ‘भाजप सोबत येण्यासाठी मला काहींनी संपर्क साधला होता. पण, जनतेने मला निवडून दिल्याने त्यांच्या मताचा आदर राखण्यासाठी ते जे सांगतील ते करणार असल्याचे आपण तेव्हा स्पष्ट केले. त्यानंतर शिरोळ येथे मी मेळावा घेतला. सर्वांनी मला शिवसेनेसोबत जाण्याचा आग्रह धरला, त्यानुसार मी हातात शिवबंधन बांधले,’ असे त्यांनी स्पष्ट केले.