मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला बोलावलं आहे. पण, रश्मी शुक्ला यांनी आता हैद्रराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीला स्थगिती देण्यास मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांनी बजावलेल्या समन्स विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांनी समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याची सूचना मुंबई पोलिसांना करावी अशी विनंती करणारी याचिका रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. पण, कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात २९ एप्रिल रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे.
आपल्या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी न्यायालयाला या प्रकरणाचे तपास अधिकारी एसीपी नितिन जाधव यांना मानसिक छळ न करण्यासाठी सूचना द्याव्यात अशी विनंती केली आहे. रश्मी शुक्ला यांचं म्हणणं आहे की, तपास अधिकारी एकापाठोपाठ एक समन्स पाठवून त्यांना त्रास देत आहेत. अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
२९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत समन्स स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत रिस्पोंडेंट म्हणून ६ लोकांना सहभागी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये यूनियन ऑफ इंडिया (डीजी सीआरपीएफ), महाराष्ट्र राज्य (चीफ सेक्रेटरी), महाराष्ट्र सरकार (अॅडिशनल चीफ सेक्रेटरी गृहविभाग) , डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस कमिश्नर आणि एसीपी सायबर क्राईम जे या प्रकरणी तपास करत आहेत.