सातारा (प्रतिनिधी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं हा साखर कारखाना जप्त केला. यावर आता स्वतः अजित पवार यांनी या कारवाईवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
“मुंबईमध्ये सुंदरबाग सोसायटीने २००७ मध्ये हायकोर्टाने याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टने त्या साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्यायला सांगितली होती. साखर कारखान्यांना एक वर्षाची मुदत द्या अशी सूचना करण्यात आली होती. एका वर्षात जर त्यांनी रक्कम न भरता पैसे थकवले तर ते विक्रीला काढा अशी सूचना मुंबई हायकोर्टाने दिली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कायदेशीर प्रक्रिया राबवून टेंडर काढून विक्री करण्यात आली. त्या १४ साखर कारखान्यांमध्ये जरंडेश्वर साखर कारखानादेखील होता. हा कारखाना विकत घेण्यासाठी १२ ते १५ कंपन्यांनी टेंडर भरलं होतं. पण यामधील सर्वात जास्त टेंडर ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने भरलं होतं. त्यांनी ६५ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि तो विकला गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांनी इतर साखर कारखाने विकत घेतले,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
“गुरु कमोडिटीने विकत घेतलेला कारखाना तो बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड आणि माने यांनी चालवण्यासाठी मागितला होता. असे अनेक कारखाने चालवायला दिले जातात. पण दुर्दैवाने त्यांना पहिल्याच वर्षी पाच कोटींचा तोटा झाला. ३० ते ३५ वर्षांसाठी त्यांनी कारखाना चालवण्यासाठी घेतला होता. जरंडेश्वर शुगर मिल नावाने त्यांनी जी कंपनी सुरु केली होती ती नंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी ती चालवायला घेतली. पण नंतरच्या काळातही तोटा झाला. नंतर रितसर परवानगी घेत त्याचा विस्तार करण्यात आला. यासाठी रितसर कर्ज घेण्यात आलं असून ते फेडलंही जात आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “ईडीकडून गुरु कमोडिटीच्या संदर्भात काहीतरी चौकशी सुरु आहे. ती सुरु असताना कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असल्याने टाच आणली आहे. कारखाना गुरु कमोडिटीच्या नावे असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. कंपनीशी माझा काही संबंध नसल्याने मी माहिती घेतलेली नाही. पण कारवाई झाली असल्याची गोष्ट खरी आहे. ईडीला चौकशीचा अधिकार आहे. मागे इतर अनेक संस्थानीं चौकशी केल्या असून त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. जरंडेश्वर न्याय मागण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे जाईल. अनेक शेतकरी आणि आणि कामगारांच काम त्या कारखान्यावर अवलंबून आहे”.
”आम्हालाही कुटुंब प्रपंच आहे”
आम्ही राजकीय व्यवस्थेत काम करत असताना आम्हाला ही कुटुंब प्रपंच आहे. जे पैसे २० कोटी रुपये दिले ते चेकवर दिलेत कमाईचे पैसे आहेत असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं होत. मंत्री आणि पत्नीने संचालकांचे अधिकार सोडा. आम्ही तेव्हा सोडले होते. हा आरोप माझ्यावर आज नाही आधीपासून होतोय पण कारखाने विकायचे आदेश दिले होते. जनाधार ज्यांच्या मागे आहे ते काम करत राहणार किती ही चौकश्या करा, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.