मुंबई (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत संजय राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राठोड यांनी राजीनामा सोपवला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला आहे. राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते.
काय म्हणाले संजय राठोड?
संजय राठोड यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. याविषयावर बोलताना राठोड म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न विरोधीपक्षाकडून केला जात आहे. घाणेरडे राजकारण सुरू आहे. माझ्यावर आरोप लावले जात आहे. पण चौकशी सुरू आहे, या चौकशीमध्ये सर्व सत्य समोर येईल. चौकशी निपक्षपणे व्हायला हवी ‘ असे संजय राठोड म्हणाले आहेत.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.
पोहरादवीच्या महंतानी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहलं होतं. त्या पत्रात संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊ नये अशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांवर संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढत असताना आता पोहरादेवीमध्ये तीन महंतांची बैठक घेतली होती.
मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास १ तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.