वर्धा (वृत्तसंस्था) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान सेनेचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत केलं आहे.
उदय सामंत यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असंही उदय सामंत म्हणाले,
राज्यात १८ ते ४६ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजन केले होते. पण, केंद्र सरकारने ती जबाबदारी घेतली. काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पण, केंद्राकडून लशीचा पाहिजे तसा पुरवठा होत नसल्याने तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. यवतमाळला केंद्र सरकारने दिलेल्या ३५ पैकी १४ व्हेंटिलेटर बंद पडले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नारायण राणे हे केंद्रात मंत्री जरी झाले तरी त्याचा परिणाम कोकणावर होणार नाही. त्यांची कार्यशैली सर्व जण पाहून आहे. शिवसेना कोकणात मजबूत आहे, त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदामुळे काहीही होणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.