औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.
सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास ५७७९५ मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या. विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल आला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उर्वरित पाचपैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान, औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला होता. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं.