मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा सुरू करणेबाबत या सूचना आहेत.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
समितीन शाळा सुरू करण्या अगोदर खालील बाबींवर चर्चा करावी
शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहारत, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महापालिका मुख्याधिकारी नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. करोना नियमांचे काटेकोर पालन करावे. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्ती जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच करोना चाचणी करून घेणे. तसेच, शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने बोलावण्यात यावे.
शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत सूचना
१. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे – मुलांना सुरक्षित व आरोग्यदायी वातावरणात शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेने विद्यार्थी, शिक्षक किंवा शिक्षकेततर कर्मचारी वर्ग आजारी पडल्यास त्यांचे अलगीकरण व त्यांच्यावर काय उपचार करावे? शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याचा कृती आराखडा तयार करावा. शाळेत मुलांनी यावे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीने चला मुलांनो शाळेत चला अशी मोहीम राबवावी, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे. तापमापक, जंतूनाशक, साबण-पाणी इत्यादी वस्तुंची उपलब्धता तसेच, शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशानसानाने सुनिश्चित करावे.