रावेर (प्रतिनिधी) जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन’ या आजाराने धुमाकूळ घातलेला असतानाच रावेर तालुक्यातील सावदा व चिनावल परिसरातील सुकी नदीच्या पाण्यात शुक्रवारी (दि. १६) सकाळी २२ मृत बैल वाहून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी धाव घेत २२ बैलांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढून त्यांचे दफन केले. दरम्यान, याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल गुन्ह्यानुसार निर्दयीपणे वाहतूक करत असतांना २२ बैल मयत झाल्यामुळे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अज्ञात व्यक्तीने नदीच्या पुलावरुन एखाद्या वाहनातून या बैलांना पात्रात फेकून दिले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही गुरांच्या गळ्याला फास लागल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. दरम्यान, या मार्गावरून गुरांची आंतरराज्यीय तस्करीही मोठ्या प्रमाणात होत असते.
रावेर तालुक्यातील सावदा व चिनावल परिसरातून वाहणाऱ्या सुकी नदीच्या पाण्यात शुक्रवारी सकाळी काही आल्याचे दिसून आले. ग्रामस्थांना अनेक मृत बैल वाहून येताना दिसले. त्यांनी ही माहिती गावात देताच पंचक्रोशीतील अनेकांनी धाव घेतली. चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. घटनास्थळी सावदा, खिरोदा व निंभोरा येथील पोलिस व पशूवैद्यकीय अधिकारीही पोहचले. नदीच्या पाण्यात वाहून येणारे २२ मृत बैल ग्रामस्थांनी मोठे दोर आणून ते नदीच्या पात्रात टाकून अनेकजण पाण्यात उतरले. मोठी कसरत करून एक-एक करीत ग्रामस्थांनी नदीपात्रातून २२ मृत बैल बाहेर काढले. याप्रकरणी पोलीस पाटील निलेश धनाजी नेमाडे (रा.चिनावल ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील हे करीत आहेत.