औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमधील नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणानं व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे समोर आली आहे. अजय समाधान साबळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर बायकोला साडी नेसता येत नसल्याचा उल्लेख सुध्दा अजयने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे.
अजय प्लंबिंगचे काम करत असत. ५ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मात्र, त्यानंतर तो सतत निराश राहायचा. व्हॉट्सअपला सतत निराशजनक स्टेट्स ठेवायचा. मित्रांनी त्याला अनेकदा याबाबत विचारणा केली. मात्र, तो बोलणे टाळायचा. रविवारीही त्याने ‘आय क्विट’ असे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले होते. रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घरावरील पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला.
त्यानंतर रात्री १२ वाजता त्याचा मित्र त्याला भेटायला आला. अजय वरच्या खोलीत असल्याचे समजल्यावर तो थेट त्या खोलीकडे गेला असता. तर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर ही माहिती नातेवाइकांना व मुकुंदवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्याच्या खोलीत एकपानी सुसाइड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
















