सिल्लोड (वृत्तसंस्था) चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या दोन बेपत्ता महिलांचे मृतदेह पूर्णा नदीत मंगळवारी सकाळी तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फरीदाबी शेख नसीर (३५), यास्मिनबी शेख सगीर ( २८, रा. बोरगाव सारवाणी) अशी या मृत महिलांची नाव आहेत. या दोघं महिला नणंद भावजयी असून सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथील फरीदाबी आणि यास्मिनबी या दोघी सोमवारी सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने उशिरा सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. मंगळवारी पहाटे दोघींचेही मृतदेह पूर्णा नदीत तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.
दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही नदी ओलांडताना नदीत पडल्या की, त्यांनी आत्महत्या केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुग्रीव चाटे करीत आहेत. फरिदाबी यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, असा परिवार आहे, तर यास्मिनबी यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे