जयपूर (वृत्तसंस्था) लग्नात जेवणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हाणामारीत नवरीच्या वडिलांना बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, हाणामारी सुरू असताना भाच्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खिशातून १ लाख ९० हजार रुपये चोरून नेल्याचा आरोपही नवरीच्या वडिलांनी केला आहे.
राजस्थानच्या कोटा परिसरात राहणारे झुल्फिकार नौताडा यांचा मुलगा इमरान याचं लग्न होतं. लग्नात दोन्ही बाजूचे नातेवाईक जमले होते. रात्री ११ वाजता पाठवणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी जेवणाऱ्या मुद्द्यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आणि पाहता पाहता जुन्या वादांचे मुद्दे उकरून काढण्यात आले. त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. मुलाच्या वडिलांना त्यांच्याच भाच्याने जुन्या प्रकरणातील राग काढत मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत आकताफ, इम्तियाज अली, नजर अली, फरदीन, इजहार अली आणि अफरोज यांनीदेखील आपल्याला मारहाण केल्याचा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. भाच्याने आपला गळा दाबन आपला खून करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, हाणामारी सुरू असताना भाच्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खिशातून १ लाख ९० हजार रुपये चोरून नेल्याचा आरोपही झुल्फिकार यांनी केला आहे. जुनी खुन्नस काढण्यासाठी जेवणाचा मुद्दा उकरून काढण्यात आला आणि मुद्दाम वाद वाढवत हाणामारी करण्यात आली, असा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. या हाणामारीत गाड्यांवरही हल्ले करण्यात आले असून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या गाड्यांचं नुकसान झालं. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल असून किरकोळ कारणावरून गुन्हेगारी कृत्य कशा प्रकारे घडू शकतं, याची प्रचितीच सर्वांना आली आहे.