भंडारा (वृत्तसंस्था) १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही एका विद्यार्थिनीनं आत्महत्या (Suicide) केली आहे. परिक्षेत पास होऊनही आत्महत्या का केली याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. बुधवारी १२ वी च्या परिक्षेचा निकाल घोषित झाला. याच दिवशी मयुरी नावाच्या या विद्यार्थीनीने तांदळाला लावायचे विषारी औषध (पावडर) खात आपलं जीवन संपवलं. ही दुर्देवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात घडली.
मयुरी किशोर वंजारी रा. लाखनी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून शरीरात विषाचे प्रमाण जास्त झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मात्र १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही तिने आपलं जीवन का संपवलं असा प्रश्न सर्वांना पडला. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मोलमजूरी करणाऱ्या आई-वडीलांचा भविष्यात आधार बनता यावा या दृष्टीकोनातून मयुरी वाटचाल करत होती. मयुरीने शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून १२ वी ची परीक्षा दिली होती. परिक्षा दिल्यानंतर तिला निकालाची उत्सुकता लागली होती. काल (बुधवारी) दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला १२ वी च्या परिक्षेत ५५ टक्के गुण मिळाले. हा निकाल बघून मयुरी प्रचंड निराशा झाली. आपण आपल्या आई-वडिलांसाठी काहीच करु शकत नाही असे अनेक नकारात्मक विचार तिच्या मनात कल्लोळ करत होते. अखेर तिने स्वत:ला संपविन्याचा निर्णय घेतला.
निकाल पाहून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून तांदळाला लावायचे औषध (पावडर) सेवन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू दुर्देवी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला आहे, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. मात्र १२ वी च्या परिक्षेत पास होऊनही तिने आयुष्य संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.