पाचोरा (प्रतिनिधी) आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या मंडळीला पाण्यात गुंगीचे औषध देऊन लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे.
पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी असलेल्या व सेंटिंग काम करत असलेल्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे येथील एक एजंटामार्फत १ लाख ७५ हजार रुपये देवून रा पाथरी जिल्हा परभणी येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला होता. विवाह झाल्यानंतर केवळ आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरातील लोकांच्या सतर्कतेमुळे विवाहितेला बस स्थानकावरून परत आणण्यात आले होते. त्यानंतर माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव सांडु म्हस्के यांनी मुलीला माहेरी घेऊन जातो असे सांगितल्यावर सासरच्या मंडळींनी नकार दिला होता. दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्याच्या मुलीने रात्री पळून जाण्याचा कट शिजवून दिनांक २८ रोजी रात्री झोपण्यापूर्वी पाण्यात गुंगीचे औषध देऊन झोपेत असताना पळून जाण्याचा प्लॅन केला होता. परंतू रात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वडील अर्जुन व त्यांच्या पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. त्यात अर्जुन उखा पाटील हे गंभीर झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचार घेत असतांना त्यांना आज शनिवारी सकाळी सात वाजता हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.