जळगाव (प्रतिनिधी) जुन्या भांडणाच्या वादातून तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून विषारी औषध पाजल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. रात्री आठ वाजता उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी तरूणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघही संशयितांना अटक केली आहे. चेतन प्रकाश चौधरी (२३. रा. रामेश्वर कॉलनी), असे मृत तरुणाचे नाव आहे.
रविवारी दुपारी चेतन याला सचिन कैलास चव्हाण (२३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (२४), सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (३६), कुंदन रवींद्र पाटील (३०, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली होती. नंतर विषारी औषध पाजून गल्लीमध्ये पुन्हा मारहाण करून सोडून दिले होते. मुलाला मारहाण झाल्याचे कळाल्यानंतर प्रकाश चौधरी यांनी लागलीच रामेश्वर कॉलनी गाठून मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्याच्यावर अतिदक्ष विभागात उपचार सुरू होते. परंतू रात्री ८ वाजता चेतन याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
या प्रकरणाची एमआयडीसी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर चेतनला बेदम मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री एमआयडीसी पोलिसात प्रकाश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणा-या चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. गुन्ह्यातील आरोपी हे रामेश्वर कॉलनीमध्ये असल्याची गोपनीय माहिती दुपारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
पो.नि. हिरे यांनी लागलीच पोलिसांचे पथक करून त्यांना कारवाईच्या सूचना केल्या. पथक रामेश्वर कॉलनीमध्ये पोहोचताच संशयित पोलिसांचे वाहन पाहताच पळू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग त्यांना करून पकडले. ही कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, सतीश गर्जे, इम्तियाज खान यांच्या पथकाने केली.