नंदुरबार (प्रतिनिधी) सामूहिक बलात्कारानंतर मुलीचा खून झाला. परंतू पोलिसांनी दखल न घेतली नाही. पिडीत मुलीवर 4 जणांनी बलात्कार करुन तिचा खून केला. परंतू पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवला. त्यामुळे ४२ दिवसापासून न्यायाच्याप्रतीक्षेत असलेल्या पित्याने मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवला आहे.
नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात राहणाऱ्या पित्याने आपल्या मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवत तो जतन करुन ठेवला आहे. याबाबत पित्याने सांगितले की, त्यांच्या विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकाने 1 ऑगस्टरोजी बळजबरीने गाडीवर बसवून गावाबाहेर नेले. मुलीनेच नातेवाईकांना फोन करुन रणजीतसह चार जणांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. पित्याने सांगितले की , अत्याचारानंतर ते मला मारून टाकतील, असे मुलीने नंतर फोनवर सांगितले. यानंतर काही वेळानेच तिने वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचा फोन आला. मात्र, मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट करण्यात आले.
पीडितेने मृत्यूआधी कुटुंबीयांना फोन करून आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली होती. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांनाही माहिती दिली. तेव्हाच पोलिसांनी मुलीच्या मृत्यू आधीच्या व्हायरल ऑडीओ क्लीपची तपासणी करून ठोस पावले उचलणे गरजेचे होते, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, तिच्या आत्महत्येबाबतच्या फोटोंवरही कुटुंबाने काही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरेसह तिंघाना अटक केली. मात्र, केवळ आत्महत्येची नोंद केल्याने मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहाचे अंतिम संस्कार केले नाही. त्यांनी आपल्या घराशेजारील शेतात खड्डा करुन तेथे मिठातच आपल्या मुलीच्या मृतदेहाला पुरले आहे. या सर्वप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील पीडित कुटुंबीयांसोबत उभे आहेत.
विशेष म्हणजे मुलीवर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगुनदेखील मुलीच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नाही, असा आरोप पित्याने केला आहे. मुलीला फाशी दिली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुबीयांनी केला आहे. मृतदेह मिठाच्या खड्ड्यात पुरल्यानंतर पित्यासह ग्रामस्थांनी धडगाव पोलिस स्टेशनसह पोलिस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यां परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाही अंतिम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मुळात मुलींच्या कुटुंबीयांच्या मागण्यानंतर प्रशासनाने मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करणे आवश्यक होते, मात्र अद्याप यावर कार्यवाही झाली नाहीय.