चंद्रपूर (वृत्तसंस्था) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, नातेवाईक व गावकऱ्यांच्या हाती या शेतकऱ्याचे फक्त पाय व डोके सापडले त्यामुळे नागरिकांना केवळ डोके व पायावरच अंत्यसंस्कार करावे लागले आहे.
चिमूर तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल लागून असल्याने अनेक गावांच्या लगत वाघांचे वास्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी चिमूर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. अनेक जनावरांचा वाघाकडून फडशा पाडला जात आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या देविदास गायकवाडकडे चार-पाच एकर शेती असल्याने रामदास शेतीतूनच आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून देविदास गायकवाडच्या नरडींचा घोट घेतला.
ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी देविदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरीरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते. मृताचे आप्तजन तिरडीवर नेऊन मोक्षघाटावर अंतिम संस्कार करतात. मात्र, ३९ वर्षीय देविदासच्या नशिबी मात्र वेगळेच होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणातील अंतिम विधीचे सौख्यही त्याला मिळाले नाही.