धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात सलग दोन दिवस दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers suicide) केल्या आहेत. दोन्ही शेतकरी कर्जाच्या ओझ्याने हैराण झाले होते. ऋषिकेश गुलाबराव पाटील (वय २६) आणि बापू तुळशीराम कोळी (वय ५३) अशी या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
शेतात विष प्राशन करून संपविले जीवन
ऋषिकेश याने शनिवारी दुपारी शेतात विष प्राशन केले. त्याला दवाखान्यात आणले असता मृत घोषित करण्यात आले. डोक्यावरील कर्ज आणि नापिकी यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील आहेत.
कर्ज व आजाराला कंटाळून आत्महत्या
बापू कोळी याने कर्ज व आजाराला कंटाळून कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, चार मुली, मुलगा असा परिवार आहे. त्याच्याकडे सोसायटीची दोन वर्षापासून थकबाकी होती. त्यातच आजार बळावल्याने तो हताश झाला होता, असे नातेवाइकांनी सांगितले.