नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवस साजरी करण्यासाठी धरणावर गेलेल्या पाच मुली आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये सेल्फी काढणे काही तरुणींना महागात पडलं आहे. सेल्फी काढण्याच्या नादात सहा जणांचा धरणात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पाच मुली तर एका मुलाचा समावेश आहे. सध्या ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु आहे. सर्व मृतक तरुण हे शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थींनी होते. ते नाशिकच्या पाथर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या ग्रुपमधील एका मुलीचा आज वाढदिवस होता. त्याच निमित्ताने ते वालदेवी धरण येथे गेले.
या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, सेलिब्रेशन केलं. मात्र, सेल्फी काढत असताना काही मुली वालदेवी धरणाच्या कडेला उभ्या राहिल्या. यावेळी त्यांचा पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला. त्यामुळे त्या धरणात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी बाकीच्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आतापर्यंत एका मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं आहे.
दरम्यान, ही घटना कळताच या मुलांचे पालक व नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. संबंधित ग्रुपमधील सर्व मुलं मित्र-मैत्रिणी होते. नाशिकच्या पाथर्डी भागात राहणारे हे सर्वजण होते, असेही सांगण्यात आले.