सोलापूर (वृत्तसंस्था) शेतात मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील चौदा चाकी मालट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार, १८ जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास पंढरपूर-आटपाडी रोडवर सातपुते वस्ती (चिकमहूद, ता. सांगोला) येथे घडली.
इंदुबाई बाबा इरकर (५०), अश्विनी शंकर सोनार (३३), सुलक्षणा रामा भोसले (४५) कमल यल्लाप्पा बंडगर (४०), सिरमाबाई लक्ष्मण जाधव (४५), मनीषा आदिनाथ सोनार (३५, सर्व रा. कटफळ ता. सांगोला) कटफळ येथील काही महिला शेतमजूर चिकमहूद हद्दीतील सातपुते वस्ती येथे रोजंदारीवर शेतातील कामे करण्यासाठी आल्या होत्या. दुपारी २ वाजता कामाची सुट्टी झाल्यानंतर या महिला आपल्या गावी कटफळकडे जाण्यासाठी चिकमहूद ते आटपाडी रोडवर सातपुते वस्ती थांब्यावर वाहनाची वाट पाहत बसल्या होत्या. दुपारी ३.३० च्या सुमारास पंढरपरकडून आटपाडीकडे भरधाव वेगाने जाणारा १६ चाकी ट्रक (एमएच-५०-एन-४७५७) रस्त्यावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिला मजुरांना चिरडत पुढे गेला. हा अपघात इतका भयानक होता की, एका महिलेचा टायरमध्ये अडकून मृत्यू झाला, तर उर्वरित पाच महिला या एकमेकींपासून वीस ते तीस फुटाच्या अंतरावर फरफटत मृत्युमुखी पडल्या.
अपघात घडताच जोराचा आवाज होऊन गोंधळ उडाला, स्थानिक तरुणांनी मदतकार्य हाती घेतले. मालट्रक चालक सुरज रामचंद्र वीर यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक भगवानराव खणदाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. महिलांना उपचारासाठी नेण्यास विलंब अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी झालेल्या दोन महिलांच्या उपचाराची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष करून ट्रकच्या चालकास संरक्षण दिल्याचा आरोप करीत या पोलीस कर्मचाऱ्यास निलंबित करावे, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला.