चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्व.रामराव जिभाउंच्या नावाने शेतकरी सहकार पॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उभे राहिले असले तरी केवळ जिभाउंच्या नावाचा वापर आम्ही करणार नाही, त्यांच्या विचाराने आम्ही काम करू. २०१५ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर बाजार समितीची आर्थिक स्थिती सुधारली. कांदा मार्केट सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे बाजार समितीचा लौकिक वाढला. भाजपा सेना युती सरकारच्या काळात मंजूर झालेले कामे दाखवून महाविकास आघाडीचे पॅनल मत मागत आहेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीची राज्यात व बाजार समिती मध्ये सत्ता असताना सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं एक काम दाखवावे. चाळीसगाव हा उत्तर महाराष्ट्रातील गुरांचा मोठा बाजार आहे. गायीला आपण माता म्हणतो मात्र मुक्या जनावरांना साधी सावली व पाण्याची व्यवस्था हे करू शकले नाहीत. मी जाहीर आश्वासन देतो की, बाजार समिती मध्ये सत्ता आल्यास एका वर्षाच्या आत गुरांच्या बाजारात सावली साठी शेड आणि पाण्याची व्यवस्था केली नाही तर शेतकऱ्यांनी गुरे माझ्या अंगणात बांधावीत, असे आश्वासन देण्याची धमक विरोधकांमध्ये आहे का ? असे आव्हान चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. ते भाजप सेना युतीच्या चाळीसगाव येथील विराम गार्डन येथे आयोजित “स्व.रामराव जिभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनलच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार उन्मेषदादा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, चिटणीस प्रशांत पालवे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, रिपाई लोकसभा जिल्हाध्यक्ष आनंद खरात, शिवसेना तालुकाध्यक्ष राहुल पाटील, आनंदा अण्णा पाटील, सुरेश तात्या सोनवणे, बाळासाहेब राउत, राजेंद्रअण्णा चौधरी, संजय रतनसिंग पाटील, शेषरावबापू पाटील, अविनाश नाना चौधरी, संजय भास्करराव पाटील, दिनेशभाऊ बोरसे, पतिंगबापू पाटील, शिवाजीनाना हाडपे, रविंद्र केदारसिंग पाटील, अरुण पाटील,सतीश पाटे, निलेश निकम यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती धर्मराज वाघ, मच्छिंद्र राठोड, रविंद्र चुडामण पाटील, सरदारशेठ राजपूत, आजी माजी संचालक, आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, व्यापारी व हमाल मापाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर विजय संकल्प मेळाव्याला ३ ते ४ हजार मतदार, पदाधिकारी – कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय मनोगतात आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या काळात इतर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना शेकडो कोटी निधी मिळाला पण तालुक्याच्या माजी आमदारांना एक ठोस काम आणता आले नाही. फक्त पाणंद रस्ते, रोजगार हमी कामांची टक्केवारी सरपंच / सदस्यांकडून जमा केली ते कामे देखील सुरु केली नाहीत.
त्यांच्या स्वतःच्या तळेगाव गावाला २४ दिवसाआड पाणी मिळते तिथे आम्ही जलजीवन मिशन मधून थेट ३० किमी गिरणा धरणावरून पाईपलाईन आणून पाणी आणत आहोत. यांच्या बंगल्या समोर मार्केट कमिटी आहे, ४० वर्ष पालिकेत यांची सत्ता होती तरी २०१५ पर्यंत पाण्याचे साधे कनेक्शन देखील मार्केट कमिटीला ज्यांनी दिले नाही त्यांना शेतकरी बाजार समितीत पुन्हा सत्ता देणार नाहीत अशी खोचक टीका आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधकांवर केली.
केंद्रात / राज्यात भाजपा – सेना युतीची सत्ता आहे. मार्केट ताब्यात दिल्यास कुठलाही प्रस्ताव मंजूर करायची धमक माझ्यात आहे. साडेतीन वर्षात शेकडो कोटींची कामे मंजूर केली, आपला परका भेदभाव केला नाही. एक रुपया कुणाचा घेतला असेल तर दाखवून द्यावे. शेतकऱ्यांसाठी कायम संघर्षाची भूमिका मी घेतली आहे, मी शेतकऱ्यांसाठी १२ दिवस जेल भोगणारा आमदार आहे. त्यामुळे बाजार समिती मध्ये शेतकरी सहकार पॅनलची सत्ता आल्यास शेतकरी हित या विषयावर कोणतीही तडजोड करणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी मतदारांना दिले.
खासदार उन्मेषदादा पाटील यांनी मनोगतात सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना, सुरु असलेली प्रत्येक गावातील विकासकामे याच्या बळावर शेतकरी सहकार पॅनलचा विजय निश्चित आहे. सर्वाना उमेदवारी देता येणार नाही पण पक्ष जो कुणी उमेदवार ठरवेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. प्रा.सुनील निकम, शिवाजी हाडपे, संजय भास्करराव पाटील, घृष्णेश्वर पाटील, उपखेड येथील शेतकरी यांनी देखील मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.
निवडणुकीत पराभवाची भीती असल्याने स्वयंघोषित सहकार तज्ञांनी व्यापाऱ्यांचे 260 मतदान कमी केले. – आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप
महाविकास आघाडीवाले अनेक वर्ष सहकार क्षेत्र / जिल्हा बँकेत संचालक म्हणून अनुभव असलेले नेते मार्गदर्शक म्हणून मिरवतात पण इतक्या वर्षात यांना मोठे पद असो किंवा तालुक्यासाठी भरीव काम करता आले नाही. फक्त जागा अडवून ठेवायची, स्वतः पलीकडे विचार करत नाहीत, जिल्हा बँकेत सत्ता असताना विकासो गटसचिव प्रश्न यांच्या संपाचा प्रश्न सोडवता आला नाही. मेहुणबारे उपबाजार प्रश्न अनेक दशके मुद्दामहून प्रलंबित ठेवला. दादा आल्याशिवाय लिलाव सुरु करायचा नाही अश्या सूचना असल्याने व्यापारी दबावात काम करतात. मागच्या निवडणुकीच्या वेळी व्यापारी मतदार ४११ होते त्यातील २६० मतदार कमी करून ते आता १५१ वर आले आहे. निवडणुकीत पराभूत होण्याची भीती असल्यानेच स्वयंघोषित सहकार तज्ञांनी व्यापाऱ्यांचे मतदान कमी केले असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रदीप देशमुख यांचे नाव न घेता केला