अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका व शहरात लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लसीकरण व्हावे, यासाठी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती शाम पाटील व राजमुद्रा फाउंडेशनतर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या अमळनेर शहर व तालुक्यात कोविड-१९ या आजाराने थैमान घातले असून, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन किंवा इतर सर्व पर्याय अपूर्ण पडून संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत या आजारापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे जागतिक पातळीवर अनेक देशांनी सिद्ध केले असून, आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत फक्त ५५४३ लोकांना पहिला डोस तर ९१८ लोकांना दुसरा डोस तसेच शहरात ५८६६ लोकांना पहिला डोस व १५३१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आणि हे प्रमाण तालुका व शहराच्या लोकसंख्या आकडेवारी नुसार अगदी नगण्य असून आपण शासन स्तरावर योग्यतो पाठपुरावा करून शहर व तालुक्यासाठी कोविड-१९ लसीचे जास्तीत जास्त डोस उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती शाम पाटील, निनाद शिसोदे, दर्पण वाघ उपस्थित होते.