जळगाव (प्रतिनिधी) जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे, हे कोरोनाच्या कालावधीमधील लॉकडाऊनमध्ये सुद्धा सिद्ध झाले. या अन्नदात्याला सन्मानाने जगविण्यासाठी शासन, प्रशासन विविध योजना राबवित आहे. मात्र, शेतकर्यांच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असा सूर शेतकर्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि श्री राजपूत करणी सेनेतर्फे आयोजित जीवन गौरव, कृषीभूषण आणि कृषिमित्र पुरस्कार वितरणाप्रसंगी मान्यवर बोलत होते. हा सोहळा ओंकारेश्वर मंदिराजवळील किडस् गुरुकुल स्कूलच्या प्रांगणात झाला. व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार मनिष जैन, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ के.बी.पाटील, कॉंग्रेसचे दिलीप पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे खान्देश विभागीय अध्यक्ष प्रवीण पाटील, कार्याध्यक्ष विलाससिंह पाटील, पृथ्वीराज फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेशसिंह राजपूत, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश वाघ, खान्देश कुणबी मराठा पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील, किडस् गुरुकुल स्कूलचे संचालक आदेश ललवाणी, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ उपस्थित होते.
खरा आनंद शेतीतच
शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे मी सुद्धा स्वतः दररोज शेतीकडे लक्ष दिले आणि शेतीचा लळा लागला. खरा आनंद शेतीतच आहे, हे स्वतः अनुभवले. विविध प्रयोग करुन शेतीत विक्रमी उत्पादन घेतलेल्या शेतकर्यांना कृषिभूषण आणि शेतीशी संबंधित उद्योग, व्यवसाय, कर्मचार्यांना कृषिमित्र पुरस्काराने सन्मानित करताना भारावून गेलो, असे मत माजी आमदार मनिष जैन यांनी व्यक्त केले.
शेतकर्यांच्या विकासासाठी वचनबद्ध
केंद्र सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवित आहे. त्यामुळे शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. केळीसह इतर पीक उत्पादक शेतकरी, शेतमजूर आणि शेतीवर आधारित विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. के.बी.पाटील यांनी केळीबाबत आणि अनिल भोकरे यांनी देखील विविध पिकांबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच दिलीप पाटील, विलाससिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. भुसावळ येथील सेवानिवृत्त प्रा.दिलीपकुमार मदनलाल ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संदिपा वाघ व सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.















