यवतमाळ (वृत्तसंस्था) वाशीम जिल्ह्यातील दारव्हा येथे गुप्तधनासाठी खोदकामादरम्यान एकाचा मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यू दडपण्यासाठी मृतदेह त्याच्याच शेतात फेकून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला होता. मयताला चांगले पोहता येत असल्यामुळे विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू कसा काय होऊ शकतो, हा प्रकार घातपाताचा असावा, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. अखेर महिनाभरानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. देवराव रामजी बदुकले (५२, रा. शिवाजी चौक) असे मृताचे तर प्रशांत विठोबा चिरडे, गंगाधर किसन नेवारे दोघेही ( रा. दारव्हा), विनेश रामजी कारिया ( रा. कारंजा लाड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गुप्तधनाचे कनेक्शन आले समोर !
या संदर्भात अधिक असे की, दारव्हा येथील कारंजा रोडवरील शेतातील विहिरीत ६ सप्टेंबर रोजी देवराव बटुकले यांचा मृतदेह आढळून आला होता. मात्र मृतकाला पोहणे येत असल्याने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला. गुप्तधनाचे कनेक्शन समोर येत असल्याने पोलिसांनी दारव्ह्यातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
विनेश सांगायचा मला स्वप्नात घरातील गुप्तधन दिसते !
विनेश कारियाने प्रशांत चिरडेला स्वप्नात घरातील गुप्तधन दिसत असल्याचे सांगितले होते. त्यावरून दोघांनी गुप्तधन काढण्याचे ठरविले. विश्वासातील दोन खोदकाम करणारे माणसं आणण्याची जबाबदारी प्रशांतवर सोपविली. २३ ऑगस्टला देवराव बदुकले व गंगाधर नेवारे यांना कारंजा येथे सोबत नेऊन खोदकाम केले. परंतु त्यानंतर देवराव बदुकले यांची सासू आजारी असल्याने व नंतर तिचा मृत्यू झाल्याने काही दिवस खोदकाम थांबविले. त्यानंतर पुन्हा प्रशांत ३ सप्टेंबर रोजी मृतकासह गंगाधरला कारंजा येथे घेऊन गेला. सुमारे आठ फुटांच्या खोल खड्डयात आडवे दहा फुटांचे भुयार खोदण्यात आले. मात्र, त्याचवेळी वरील जमिनीचा ढाचा कोसळून त्यात देवराव बटुकले यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या तिघांनी मृतदेह तिथेच सोडून पळ काढला.
सायंकाळी दारू ढोसली, नंतर मृतदेह फेकला विहिरीत !
प्रशांत व गंगाधरने दुचाकीने दारव्हा येवून सायंकाळी बारमध्ये दारू ढोसली. जेवण केल्यानंतर चारचाकीचा बंदोबस्त करून मृतदेह दारव्हा येथे आणला. कारंजा रोडवरील मृतकाच्या शेतातील विहिरीतच मृतदेह, चपला, मोबाइल फेकून दिला. त्यानंतर काही घडलेच नाही, या अविर्भावात फिरत होते. परंतु, पोलिसांनी चौफेर तपासातून या प्रकरणाचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०४, २०१ सह महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानूष अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोना प्रतिबंध, उच्चाटन कायदा २०१३ चे कलम ३ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.