सावदा (प्रतिनिधी) गावातील विजेचे ट्रान्सफार्मर बंद करुन अंधाराचा फायदा घेत किरकोळ कारणावरुन झालेल्या झालेल्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना दि. १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चिनावल येथे घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर गावात दि. २० मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण !
चिनावल येथील माधुरी महाजन यांनी सावदा पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये त्या दि. १७ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वाँकींग करण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, त्यांना वाघोदा रोड ते मेस्कोमळा परिसरात मोठ्याने आरडाओरड सुरु असल्याचे समजले. तसेच काही वेळताच मोठा जमाव त्यांच्या दिशेने येवून दगडफेक करीत असल्याचे त्यांना दिसला. या जमावाने महादेव वाडा, महाजन वाडा परिसरात दगडफेक करीत मोटरसायकलचे देखील नुकसान केले. जमावाच्या वादामध्ये माधुरी महाजन यांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्रस गहाळ झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचानक झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून दगडफेक करणाऱ्या संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. काही वेळताच परिस्थितीवर नियंत्रण
पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती आणली नियंत्रणात !
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंह, सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांच्यासह है फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, पोलिसांकडून दगडफेकीच्या घटनेचे कारणांचा शोध घेतला जात आहे. गावात फैजपूर, निभोरा, रावेर येथुन अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाचे जवान गावात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी !
दगडफेकीच्या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.
सप्ताहमध्येही खंड
चिनावल गावातील एका भागात हरिनाम अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु दगडफेकीच्या घटनेमुळे संचारबंदी लागल्याने या सप्ताहातही खंड पडला आहे. संचारबंदीतून शेतकऱ्यांना मिळावी मुभा चिनावल गावात मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकरी आहेत. संचारबंदी लागू झाल्याने शेती व गाव निर्मनुष्य झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढणी योग्य केळी तयार आहे. संचार बंदीमुळे घराबाहेर निघणे शक्य नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे यासाठी केळी कापणीसाठी तरी किमान संचार बंदीतून मुभा मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत
फैजपूर उपविभागीय अधिकारी फैजपूर यांनी चिनावल गावात दि. २० मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. गावातील व्यवहार पूर्णपणे बंद झाले असून त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शेतात जाणारे शेतमजूर, दैनंदिन उघडणारे आस्थपने, किराणा, दुध डेअरी, हे बंद असून रस्त्यावर शुकशुकाट आहे.
गावात रात्रभर सर्च ऑपरेशन !
गावात मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार शिंदे, सपोनि जालिंदर पळे, पो उप निरीक्षक खांडबहाले, हे तळ ठोकून आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणाव मात्र कायम आहे. सावदा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते.