मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे राज्यात अनेक निर्बंध हे शिथिल करण्यात आले आहे. दुकानं, हॉटेल्स, मॉल्स सुरू करण्यात परवानगी दिली आहे. पण, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल, त्या दिवशी पुन्हा कठोर लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यात येत्या १५ ऑगस्टपासून रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेचं स्वरूप कसं असेल, याविषयी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये मुंबईतील लोकल प्रवास, हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे, मॉल्स, मंगल कार्यालये यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यासोबतच राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी देखील राजेश टोपे यांनी माहिती दिली.
राजेश टोपे यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या परिस्थितीवर लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं यावेळी नमूद केलं. “तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एकूण उत्पादित होणारा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन १३०० मेट्रिक टन आहे. औद्योगिक क्षेत्राने अजून २०० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवण्याची खात्री दिली आहे. त्याप्रमाणे त्यांनी वाढ देखील केली आहे. राज्यात एकूण ४५० पीएसए प्लांट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. त्यापैकी १४१ प्लांट्समध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही सर्व क्षमता जरी वापरली, तरी १७०० ते २००० मेट्रिक टनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे. केंद्रानं सांगितलंय की दुसऱ्या लाटेचा पीक होता, त्याच्या दीडपटीची व्यवस्था करून ठेवा. त्यामुळे ३८०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागू शकणार आहे”, असं राजेश टोपे यांनी नमूद केलं आहे.
“ऑक्सिजनच्या अशा परिस्थितीमुळे असा निर्णय घेण्यात आला आहे, की तिसऱ्या लाटेमध्ये ज्या दिवशी राज्यात ७०० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन लागेल, त्या दिवशी राज्यात ऑटो मोडवर कठोर लॉकडाऊन लागू करण्यात येईल. इतर राज्यात देखील ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर लागत असल्यामुळे केंद्राकडून वेळेवर किती मदत मिळू शकेल, हे सांगता येणं शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भात आपण हा निर्णय घेतला आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.