मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात लॉकडाऊन लागू होणार हे आता निश्चित झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी नंतर मंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. पुढील १५ दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या लॉकडाऊनबाबत माहिती देतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनवर एकमत झालं आहे.
राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता उद्यापासून १५ दिवस कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे म्हणालेत.
”राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील”, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
राज्यामध्ये कोविडचे आकडे वाढतायत. हे पाहिल्यानंतर राज्यामध्ये फारच भयंकर आणि भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढणारे आकडे खाली आणायचे असल्यास कठोर निर्बंध घेण्याची आवश्यकता आहे. अनेक निर्बंध घालूनही माणसं फिरतायत, वाहनं फिरतायत, नंबर खाली येत नाहीयेत. त्यामुळे कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे, असंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय.
आज ऑक्सिजन मिळत नाही, आपल्या राज्यात जो ऑक्सिजन उपलब्ध होतोय तो पुरत नाही. इतर राज्यांतून आपण ऑक्सिजन आणतोय. कोरोनाची साखळी तोडायची असल्याने लॉकडाऊनच्या काळात आरोग्य मंत्र्यांनीदेखील अनेक सूचना केल्यात, ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे करायचे. हवेतून ऑक्सिजन घेऊन आपण स्वतः ऑक्सिजन तयार करायचे. ऑक्सिजन काँन्सटेटर आपण मागवायचे. १०० मेट्रिक टनचा राज्य सरकारचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असल्यास तोसुद्धा कोविडमध्ये कामी येऊ शकतो. ही चेन ब्रेक करायची असल्यास कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या निर्णय जाहीर करतील. ऑक्सिजनच्या गाडीला ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता असल्यास तोसुद्धा घेण्यात आलाय. त्यामुळे ऑक्सिजनच्या गाड्यांना राज्यांत येण्यापासून अडथळा निर्माण होणार नाही. लॉकडाऊन हा आवडीचा विषय नाही. कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
काही करु लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन बाबत घोषणा करतील अशी माहिती राजेश टोपे यांनीही दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. मात्र बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.