धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार संबंधी तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाहीय. त्यामुळे केंद्र शासन व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवालानानुसार दोषी व्यक्ती अथवा अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून, पद अपात्र व शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या (Cm Eknath Shinde Office) दालनात २६ जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा ईशारा दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील झुरखेडा येथील ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सरपंच / उपसरपंच / सदस्य यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ अन्वये कार्यवाही करण्यात यावी ,असे म्हटलेले असून देखील साधारणपणे एक वर्षांपासून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कारवाई केलेली नाहीय. आजपर्यंत गटविकास अधिकारी चोपडा यांनी चौकशी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाई करावी व ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक व विस्तार अधिकारी धरणगाव यांनी देखील चौकशी करतांना विलंब लावल्यामुळे त्यांच्याविरुद्ध देखील नियमानुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सुरेश पवार यांनी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी हे या सर्व अधिकारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, झुरखेडा ग्रामपंचायत उपसरपंच तथा आत्ताचे प्रभारी सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व नियम बाह्य काम करणारे ठेकेदार व्यक्तींना परिपूर्णपणे वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून होत असेल तर मग सामान्य माणसांनी दाद मागायची तरी कोणाकडे ?, या सर्व्यांना शासनाच्या पैश्याची उधळपट्टी करण्यास परवानगी कोणी दिली?, असे लोकं शासनाची देखील फसवणूक करीत आहेत तसेच अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे झुरखेडा ग्रामपंचायतची दि. २३ डिसें. २०२२ रोजी १४ ग नुसार अपात्रतेची सुनावणी पूर्ण होऊन देखील राखीव निकाल आज रोजीपर्यंत का देण्यात येत नाही?. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांच्याकडून दि. १० जानेवारी २०२३ पर्यंत सांगितल्यानुसार कोणतेही उत्तर प्राप्त न झाल्यामुळे दि. २६ जानेवारी २०२३ रोजीच्या मुख्यमंत्री यांच्या दालनात जाऊन आत्मदहन करण्याचा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सुरेश पवार यांनी दिला आहे.