नागपूर (वृत्तसंस्था) राज्यसभेमध्ये बुधवारी महिला खासदारांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप विरोध पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. बाहेरून आलेल्या ४० महिला व पुरुषांनी राज्यसभेमध्ये घुसून महिला खासदारांना मारहाण केली. या घटनेने सध्या देशातील राजकारण चांगलंच तापलंय. या घटनेवरून आता रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा अशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच आज काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.