नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच बऱ्याच घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत हे सारं सरकारने आधीच ठरवून केलं आहे. तसेच राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, मला विचाराल तर आज अतिशय दुर्दैवी दिवस आहे. आम्ही, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी ठरवलं होतं की शांततेतच चर्चा करायची. कुणीही वेलमध्ये उतरलेलं नव्हतं. संसद ही जागाच चर्चेसाठी असते आणि सकाळीही आम्ही चर्चेची मागणी केली होती, तीही धुडकावून लावली. सत्ताधारी एकीकडे चर्चेला तयार आहोत, असं म्हणत होते मात्र केंद्र सरकारला यावर चर्चा करायचीच नव्हती असं त्यांच्या वागण्यावरून दिसून येतंय. हे देशासाठी अत्यंत हानीकारक आहे. कुठलंही विधेयक असो, चर्चाही झालीच पाहिजे. संविधानाला धुडकावूनच संसदेत निर्णय घेतले जात आहेत. खरं तर ही आणीबाणीच आहे, मात्र, ते अधिकृतरित्या जाहीर नाहीये. मात्र ते स्वत:ला मन मानेल तसंच वागत आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन पुर्वनियोजत आहे. जेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना विधेयक मंजूर करण्यासाठी आकडे कमी पडत आहेत. तेंव्हा हे लक्षात घेता त्यांनी राज्यसभेतील बारा खासदारांचं निलंबन हेतुपूर्वक केलंय. तुम्ही या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहा, तुम्हाला हे समजून येईल. त्यामुळे राज्यसभेतील १२ खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड आहे.