पुणे (वृत्तसंस्था) ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्यातील कात्रज बोगद्यातून नवले पुलानजीक हायवेवर भीषण अपघात झाला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात एका जणाचा मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी झालेला आहे.
विद्याधर शंकर साळुंके (वय ६८, रा. प्लॉट नं ८२ अध्यापक कॉलनी सहकारनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमजद खान (वय ४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. दीव-दमण येथील DD. ०१. C. ९४६७ या क्रमांकाचा टेम्पो सुरुत येथून भाजीपाला घेऊन मुंबईच्या दिशेने आज(शनिवारी) सकाळी निघाला होता. दरम्यान, हा टेम्पो कात्रज बोगद्यातून नवले पूलाच्या दिशेने जात असताना, त्यावेळी उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि या भरधाव टेम्पोने तीन रिक्षा आणि चार कारला जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेत सहकारनगरमध्ये राहणारे विद्याधर शंकर साळुंके आणि अमजद खान हे जखमी झाले. त्या दोघांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील विद्याधर शंकर साळुंके यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अमजद खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपी टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.