अहमदाबाद (प्रतिनिधी) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स रविवारी होणाऱ्या आयपीलएच्या अंतिम फेरीतून दुसऱ्या विजेतपदासाठी लढताना दिसतील. बंगळुरूने गतवर्षी पहिल्यांदाच किताब पटकावला होता आणि आता सलग दुसऱ्यांदा जेतेपद राखण्यासाठी उत्सुक असतील, तर गुजरात २०२२ नंतर पुन्हा इतिहास लिहण्यासाठी सज्ज आहे. तारांकित फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यातील द्वंद या लढतीचे आकर्षण असेल.
कागदावर गतविजेता एक प्रबळ दावेदार मानला जातो.कारण त्यांचा निर्भय आणि धोका पत्करणारा खेळ संपूर्ण स्पर्धेत प्रभावी ठरला आहे. या आक्रमक रणनीतीमुळे संघ कधीकधी अडचणीत आला आहे, परंतु विराट कोहली (६०० धावा), देवदत्त पडिक्कल (४६३), टीम डेव्हिड (२८१), (४८६) उपलब्ध असताना फिल सॉल्ट, व्यंकटेश अय्यर यांनी सातत्याने आक्रमक फलंदाजी केली आहे. यंदाच्या हंगामात इतर कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक वेळा २०० धावांचा पल्ला ओलांडण्याचा विक्रम बंगळुरूच्या नावावर जमा झाला आहे. कर्णधार रजत पाटीदारच्या शांत आणि संयमी नेतृत्वशैलीमुळे गेल्या दोन हंगामांपासून संघाला स्थिरता प्राप्त झाली आहे. भुवनेश्वर कुमारच्या (२६ बळी) नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमणाला लयमध्ये असलेल्या गुजरातच्या आघाडी फळीविरोधात सर्वोच्च कामगिरी करावी लागेल. जोश हेझलवूड (१३ बळी), रसिक सलाम (१६ बळी) आणि अष्टपैलू कृणाल पंड्या (१३ बळी) यांनी मिळून एक बलाढ्य गोलंदाजी आक्रमण तयार केले आहे.
कर्णधार शुभमन गिल (७२२ धावा), साई सुदर्शनने (७१०) आणि जोस बटलरने (५०७ धावा) या आघाडीच्या फळीवर गुजरातची मदार आहे. यंदाच्या हंगामातील गुजरातचा घरच्या मैदानावरचा विक्रम (सातपैकी पाच विजय) निश्चितच संघाला काहीसा आत्मविश्वास देणारा आहे. तथापि, हे आव्हान सोपे नसेल. कारण बंगळुरूची गोलंदाजी अत्यंत वैविध्यपूर्ण आणि धारदार आहे. गुजरातची मदार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (२८ बळी) आहे. मोहम्मद सिराज (१८), राशीद खान (१९), जेसन होल्डर (१७) आणि प्रसिध कृष्णा (१६) यांच्यासारख्या गोलंदाजांनी मिळून एक जबरदस्त आक्रमण तयार केले आहे. रबाडा आणि सिराज यांनी या हंगामात मिळून अनुक्रमे १६५ आणि १६२ निर्धाव चेंडू टाकले आहेत, यावरून असे दिसून येते की दोन्ही सपाट खेळपट्ट्यांवरही फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.
सिराजच्या तंदुरुस्तीवरही लक्ष ठेवले जाईल. कारण, शुक्रवारी मुल्लानपूर येथे राजस्थानच्या क्वालिफायर २ मध्ये त्याला खांद्याचा त्रास जाणवला होता आणि या परिस्थितीतही त्याने आपल्या चार षटकांचा कोटा पूर्ण केला होता. पण तो मैदानावर अस्वस्थ दिसत होता.उभय संघ क्वालिफायर-१ मध्ये एकमेकांशी भिडले होते. त्या वेळी बंगळुरूने फलंदाजांच्या सरस कामगिरीवर बाजी मारली होती. गुजरात या लढतीमधील उणिवा दूर करून आव्हान देण्याच्या तयारीत असेल.
















