मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे व ते संपुर्ण देशात ते लागू करावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
मशिदींवरील भोंग्याचा वाद भाजपनेच उकरून काढला आहे. भाजपच्या इशाऱ्यावरच हा मुद्दा तापवला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, भोंग्यांबाबत एवढे आक्रमक असाल तर अजूनही गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमधील भोंगे का काढले नाही, असा सवालही त्यांनी केला. भोंग्यांबाबतचा वाद शमवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशपातळीवर एकच धोरण बनवावे व ते सर्व राज्यांना लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हे धोरण लागू केल्यानंतर भाजपशासित राज्यांमधील मशिदींवरील भोंगे उतरावेत, असेही राऊत म्हणाले.
केंद्र सरकारने देशपातळीवर गोवंश हत्याबंदीचा निर्णय घेतला. मात्र, नंतर त्यांच्याच भाजपशासित राज्यांनी हे धोरण आपल्या राज्यात लागू करण्यास नकार दिला. यात गोवा व नॉर्थ ईस्टमधील राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्राने भोंग्यांबाबत धोरण लागू करताना ही काळजी घ्यावी व सर्व राज्यांमध्ये हे धोरण लागू हे पाहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.