मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. देशालाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्धतीने देशाला काम करावं लागेल असं ते म्हणाले आहेत.
ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक केले. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. पण कोरोना संकटामुळे देश २० वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होताना दिसत आहे. हा काळाबाजार सरकार करत नाही. अहमदनगरमधील एका नेत्यानेही अशाचप्रकारे इंजेक्शन्स आणली. तो विषय वेगळा आहे. तरीही रेमडेसिविर इंजेक्शन्स ही सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
उत्तर प्रदेशला मदत केली पाहिजे
“प्रियंका गांधी या राज्याच्या काँग्रेस प्रभारी आहेत. उत्तर प्रदेश खूप मोठं राज्य आहे. त्या राज्याची लोकसंख्या खूप मोठी आहे. संपूर्ण राज्याची परिस्थिती चिंताजनक आहे. यात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशला काय मदत करता येईल हे पहायला पाहिजे,” असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.