जालना (वृत्तसंस्था) मुलबाळ व्हावे म्हणून दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या दाम्पत्याच्या कारला झालेल्या अपघात महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना मंठा तळणी रोडवरील महावीर जिनिंगजवळ शुक्रवारी पहाटे 3:55 वाजताच्या सुमारास घडली. सविता अमोल सोळंके (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे यावेळी गाडीत सवितासोबत त्यांचा पतीही होता, तो सुखरूप आहे. त्यामुळे पोलिसांनी घातपातच्या दृष्टीनेही चौफेर तपास करायला सुरुवात केली आहे.
अमोल गंगाधर सोळंके व त्यांची पत्नी सविता हे परतूर तालुक्यातील कन्हाळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे मागील दहा वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे ते दर गुरुवारी वारीसाठी शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला जात होते. त्यानुसार ते गुरुवारी सकाळी शेगावला दर्शनाला गेले होते.
गुरुवारी रात्री शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कारमधून (क्र.एम.एच. २१. ए.एक्स.७७५५) गावाकडे निघाले होते. त्यांची कार मंठा शहराजवळील हिवरखेडा पाटीजवळ आली असता पाठीमागून आलेल्या मालवाहतूक वाहनाने जोराची धडक दिली. अ अपघातानंतर अमोल सोळुंके हे कारमधून उतरुन कारला झालेले नुकसान पाहत होते. त्याचवेळी त्यांचा संबंधित वाहन चालकासोबत सोबत वाद सुरु झाला. त्यांच्यात वाद सुरू असताना अचानक कारला आग लागली.
कारला आग लागताच संबंधित वाहनचालक फरार झाला. कारने मोठा पेट घेतल्याने अमोल सोळंके यांना काहीच करता आले. त्यामुळे डोळ्यासमोर कारमध्ये पत्नीचा होरपळून मृत्यू झाला. परंतू या दुर्घटनेत अमोल यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्यामुळे संशयावरून अमोल याला ताब्यात घेतल्याचे कळते. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत सविता सोळंके यांचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणात मंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.