भंडारा (वृत्तसंस्था) गोंदिया जिल्ह्यातील विवाह आटोपून भंडाराकडे परतणाऱ्या कारच्या ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे भंडाऱ्यातील तुमसर जवळील देव्हाळा गावाजवळ भरधाव कार पलटी झाली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य सहा गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.
विश्वनाथ कस्तुरी (४०) रा. कान्हळगाव आणि देवचंद दमाहे (४०) रा. खमारी रा. मोहाडी असे मृतकांचे नावे आहेत. तर, अमरदिप कस्तुरे (१४), पंकज बर्वेकर (२८), पत्तू लिल्हारे (३१), मयूर गोमासे (२४), सूर्यप्रकाश कस्तुरे (२९) आणि अन्य एक (नाव कळू शकले नाही) असे सहा जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर भंडाऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव येथील कस्तुरे परिवारातील विवाह सोहळ गोंदिया जिल्ह्यातील लोधी टोला येथील मुलीशी होता. विवाह आटोपून वऱ्हाडी मंडळी एमएच क्र. (२० सी एस ४३०७) या वाहनाने गावाकडे परतत होते. मध्यरात्री ड्रायव्हरला डुलकी आली आणि भरधाव कार रस्त्याच्या कडेला शेतात शिरली आणि दोन तीन पलट्या घेतल्या. या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झालेत. सर्वांना भंडाऱ्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.