अमरावती (वृत्तसंस्था) शेतातील विहिरीतून अचानक दुर्गंधी येत असल्यामुळे शेतकऱ्याने विहिरीच्या पाण्याचा उपसा सुरू केला. विहिरीचे संपूर्ण पाणी उपसल्यानंतर बुडात त्यांना दोन पोते दिसले. ही पोते बाहेर काढल्यानंतर मात्र, सगळ्यांचाच थरकाप उडाला. कारण एका पोत्यात शीर, धड नसलेला मानवी मृतदेह होता. तर दुसऱ्या पोत्यात दगड बांधलेले होते.
एकलविहीर जंगलालगत शिवारातील राजेंद्र सदाशिव ढोके यांच्या विहिरीतील पाण्यातून शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी पाण्याचा उपसा करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात विहिरीतील पाणी संपून बुड दिसायला लागले. बुडात दोन दोन निळ्या रंगाची पोती देखील दिसत होती. काही गंभीर विषय असल्याचे जाणवल्यामुळे ढोके यांनी गावातील पोलीस पाटील यांना संबंधीत घटना कळवली. थोड्याच वेळात पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी दोघं पोते बाहेर काढली.
पोलिसांनी पोते उघडताच सर्वांचा थरकाप उडाला. पहिल्या पोत्यात काळ्या रंगाची जीन्स पॅट कमरेपर्यंत कुजलेला मृतदेह वजा हाडाचा सांगाडा आढळला. मृतदेहाच्या कमरेपासून वरील धड आणि मुंडके गायब होते. तसेच पोत्यामध्ये चुना आणि ब्लिचिंग पावडर टाकलेले होते. तर दुसऱ्या पोत्यात दगड भरलेले होते. मृतदेह पाण्यात तरंगून वर येऊ नये, म्हणून आरोपींनी ही क्लुप्ती लढवलेली होती.
अंदाजे १५ ते २० वर्षे वयोगटातील तरुणाचा हा मृतदेह असल्याचा पोलिसांचा अंदाज असून साधारण १ महिन्यापूर्वी या युवकाचा खून झाला असावा. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह विहिरीत फेकला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मृतदेहाचे कमरेपासून मानेपर्यंत धड आणि मुंडके शोधण्याकरिता पोलिसांनी परिसर पिंजून काढला, मात्र यश आले नाही. पँट व कमरेच्या पट्ट्याशिवाय कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना आधी मृतदेहाच्या शरीराचे उर्वरित धड व शिर शोधून काढावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.