मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आक्रमणाला उत्तर देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला की, या संपूर्ण नाट्याचं नेपथ्य कोण करत आहे? कथा कुणाची आहे? सुत्रधार कोण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल.”
“सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि वृत्तपत्रात जागा मिळवण्यासाठी विरोधक असं आरोप करत असतात. फडणवीसांनी काल केलेले आरोप मी पाहिले. गिरीश महाजनांविरोधात खोटं प्रकरण उभं केलं गेल्याचे ते म्हणाले. पण या संपूर्ण नाट्याचं नेपथ्य कोण करत आहे? कथा कुणाची आहे? सुत्रधार कोण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही. सरकार लवकरच दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल”, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.
“गिरीश महाजनांविरोधात काहीतरी खोटं प्रकरण उभं केल्याचं सांगितलं जात आहे. पण महाराष्ट्राचे पोलीस असं करत नाहीत. त्यांना चांगलं प्रशिक्षण आहे. राज्याच्या पोलिसांना देशात यासाठी प्रतिष्ठा मिळाली कारण ते राजकीय दबावाखाली काम करत नाहीत. त्यांना जर असे खोटे पुरावे आणि षडयंत्र रचायचं असेल तर आम्हाला त्यांना ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडे धडे घ्यायला पाठवावं लागेल. राजकीय नेत्यांना कसं अडकवायचं, खोटे पुरावे कसे उभे करायचे हे काम केंद्रीय यंत्रणांकडून सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणाले.