छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) एकमेकांवर प्रेम असूनही कुटुंबाने विरोध करत मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, महिन्याभरात मुलीला त्रास सुरू झाला. तिने तिच्या प्रियकराला ही बाब कळवताच त्याने तिला आपण पुन्हा लग्न करू, तू काळजी करू नको असा विश्वास दिला. परंतू यानंतर प्रेमीयुगुलाने मंगळवारी रात्री साडेदहा वाजता रेल्वेस्थानक परिसरात दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली. यात रमेश (२३, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याची १९ वर्षांची प्रेयसी राणी ( दोघांचे काल्पनिक नाव) गंभीर जखमी झाली.
कुटुंबाच्या चिडचिडीनंतर आत्महत्येचा निर्णय !
दोन वर्षांचे प्रेम असूनही कुटुंबाने विरोध करत मुलीचे लग्न लावून दिले. मात्र, महिन्याभरात मुलीला त्रास सुरू झाला. तिने तिच्या प्रियकराला ही बाब कळवताच त्याने तिला आपण पुन्हा लग्न करू, तू काळजी करू नको, असे आश्वासन दिले. सोमवारी तिला ठाण्यातून घेत पुण्याला नेले. तेथून मित्रांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगरला घ्यायला बोलावले. मात्र, मित्र अजिंठापर्यंत पोहोचलेले असतानाच फोनवरच आम्ही आत्महत्या करत असल्याचे सांगत दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली.
कुटुंबाने समजून न घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल !
दोघांनी घर सोडल्याची माहिती तोपर्यंत नातेवाइकांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे दोघांना सलग कॉल सुरू झाले. राणीने मोबाइल बंद केला. मात्र, रमेशला कॉल सुरूच होते. आई, वडील, भावासह राणीचे नातेवाईक त्याला संपर्क करून रागावत होते. रमेशचा भाऊ मात्र त्यांना समजावून सांगत होता. रमेशला मात्र इतर नातेवाइकांचे रागावणे असह्य झाले. हे आपले लग्न लावणार नाहीत, असे म्हणत सोबतच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
नात्यातच असलेले रमेश व राणी या दोघांचे दोन वर्षांपासून एकमेकावर प्रेम होते. आठ महिन्यांपूर्वी रमेश शिक्षणासाठी पुण्याला भावाकडे गेला होता. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबाने मात्र राणीचे मध्य प्रदेशच्या मुलासोबत लग्न लावले. हा प्रकार रमेशला असह्य झाला होता. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संपर्क तुटला; परंतु २७ मार्च रोजी राणी पतीसह ठाण्याला स्थायिक झाली. तेव्हा तिने रमेशला संपर्क केला. माझा पती मला त्रास देत आहे, असे सांगितले. तेव्हाच रमेशने पुन्हा राणीला लग्नाचे वचन देत पळवून नेण्याचा निश्चय केला. ठाण्याला जात त्याने टॅक्सीने राणीसह पुणे गाठले. मंगळवारी दोघे साडेदहा वाजता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. तेव्हाच रमेशने गावाकडील मित्रांना आम्हाला संभाजीनगरला घ्यायला या, असे कॉल करून सांगितले होते.
हातात हात घेत रेल्वेसमोर घेतली उडी !
रात्री साडेदहा वाजता दोघेही रेल्वेरुळाजवळ उभे होते. राणी कॉलवर बोलत असतानाच रमेशने तिच्या पकडलेल्या हातासह रेल्वेसमोर उडी घेतली. रेल्वेच्या धडकेत दोघेही लांब फेकले गेले. रमेश मात्र गंभीर जखमी झाला. राणी जखमी अवस्थेत मदतीसाठी ओरडत होती. स्थानिकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना घटनेची माहिती दिली. बागवडे यांनी तत्काळ पथक रवाना केले. रमेशच्या शरीराचे तुकडे झाले होते तर राणी मात्र शुद्धीत होती. तिला पोलिसांनी घाटी रुग्णालयात दाखल केले.
मला उमेशला बघायचेय, राणीचा आक्रोश !
रात्री साडेदहा वाजता घटना घडल्यानंतर राणी जखमी झाली. मात्र, अंधारात रमेश मात्र तिला दिसत नव्हता. पोलिस पोहोचल्यानंतर ती सतत मला रमेशला पाहायचेय, असे म्हणत होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतरदेखील ती सतत मला रमेशला शेवटचे पाहू द्या, अशी विनंती करत होती. सायंकाळी पाच वाजता रमेशवर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.