भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ येथील सुचिता शुभम बारसे (वय २५) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून महिलेचा पती तथा संशयीत आरोपी शुभम चंदन बारसे यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भुसावळ शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील सात नंबर पोलिस चौकीच्या मागे रात्रीच्या वेळेस महिलेचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील कवाडेनगर भागात राहणाऱ्या सुचिता ओमप्रकाश खरे (वय २७) या महिलेचा रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, संदीप दुनगहू, गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दोन तासांत संशयित अटकेत
शहरातील भीमवाडी झोपडपट्टी परिसरातील रहिवासी शुभम चंदन बारसे याचे पत्नी सुचिता बारसे यांच्यासोबत किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत, तर सुचिता हिचे शुभमसोबत दुसरे लग्न झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून चार वर्षांचा मुलगा आहे. या मुलाच्या सांभाळ करण्यावरून आरोपी शुभम व सुचिता यांच्यात भांडण सुरू असल्याचे सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच शुभम हा सुचिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यानेच तिची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शुभम बारसे यास अटक केली.
प्रेमसंबंधातून सुचिताने केला दुसरा विवाह
मृत सुचिता आणि तिचा पती शुभम यांचे शिक्षण शाळेत सोबत झाले होते. शिक्षणादरम्यान बारावीत असताना त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या वेळी सुचिताच्या वडिलांनी शुभमला विवाहासाठी गळ घातली होती. मात्र, शुभमने आपले शिक्षण सुरू असल्यामुळे लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी तिचा विवाह दुसरीकडे लावून दिला. तिला दोन वर्षांनंतर एक मुलगा झाला. मात्र यानंतर ती पतीला सोडून माहेरी राहण्यास आली. यादरम्यान तिने शुभमशी विवाह केला. विवाहानंतर दोघेही पोर्टल चाळीतील शुभमच्या घरी राहायला गेले. सुचिताला शुभमपासून दुसरा मुलगा झाला. यानंतर पहिल्या मुलाच्या सांभाळ करण्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. चार महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये भांडण झाल्याचे सुचिताच्या वडिलांनी सांगितले. वादामुळे ती माहेरी गेली होती. मात्र मंगळवारी (ता. २८) ती पुन्हा आपल्या सासरी परतली, तर बुधवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास तिच्या खुनाची बातमी समोर आली.